मंगळवार, डिसेंबर २७, २०११

ठाणे-पुणे-ठाणे



                       प्रवास !!!, हा प्रवास आपल्या सारख्या सामान्य माणसांना कधी चुकलाय का? जीवनाचा प्रवास असो किंवा बैलगाडी-घोडागाडी, चालत वैगेरे कसाही प्रवास असो, आपल्या नशिबी प्रवास कधीही येऊ शकतो. ह माहिती आहे कि  हे जरा अतीच होतंय पण माझा तुम्हाला एक प्रवास वर्णन सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे.
                      माझा प्रवास होता ट्रेनचा!! नॉर्मली आपण तो रोजच अनुभवतो पण त्यात आजू बाजूला घडणाऱ्या  काही बारीक घडामोडींवर आपले कधी लक्ष जात नाही. मागे गुगल प्लस आणि मेल द्वारे मी आणि माझे नेट वरील जमलेले मित्र मिळून पुन्हा एकदा भेटण्याचा विचार मनात आणतच होतो. आमची मागची पहिली बझ्झ भेट अतिशय आठवण जागवणारी होती. म्हणून पुन्हा एकदा भेटण्याचे आम्ही ठरवू पाहत होतो. कारण मैत्रीची ओढ काही वेगळीच असते आणि तसच मैत्रीचा आमच्या प्रवासाशी जरा घट्टच संबंध आहे बर का मंडळी!
                     तर आमची दुसरी बझ्झ मंडळ भेट म्हणजेच स्मरणीय भेट जीच्या प्रवासाचे कौतुक जरा सांगण्यासारखे आहे. आम्ही पुण्या - मुंबईतल्या सर्व बझ्झ-मित्रांनी ठरवले कि पुन्हा एकदा भेटायचे जसे ठरवले तशी आमची तयारी जोशात सुरु झालेली होती, मुंबईहून कोण? पुण्यातून कोण? स्वागत कस करणार? कोण कोण भेटणार? काय काय कार्यक्रम करायचे? कस भेटायचे? वैगेरे वैगेरे अस सर्व काही आम्ही ठरवून
२५-१२-२०१२ ला पुन्हा भेटण्याचे निश्चित करून तयार झालो. आणि त्याप्रमाणे तो दिवस ठरवून आम्ही मोकळे सुद्धा झालो.                 
                      बझ्झ भेटीच्या प्रवासाचा तो दिवस नाही नाही म्हणता उजाडलाच..... पहाट झाली. आम्ही सर्व मुंबईतले मित्र एकमेकांच्या सानिद्ध्यात फोन वरून होतोच. सकाळ झाली, थंडीही खूप होती मी आणि भांडुपचे तिघे तयारी करून घरातून निघाले. रस्त्यात गाडीची वेळ, पोहोचण्याचा वेळ इत्यादींचा अभ्यास करत करत आम्ही ठाणे स्टेशनला भेटलो, रम्य पहाट, गुलाबी थंडी अश्या सुंदर वेळेचा स्टेशन वर अनुभव काय सांगावा. एरव्ही कर्णकर्कश्य वाटणारी ती अनाउन्समेंट जराशी मृदुल वाटत होती, समोर दूर रेल्वे पटरीवर पसरलेले पांढरे शुभ्र धुके, आणि त्या धुक्यातून हळूंच किंवा धाडधाड बाहेर येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या असे वाटत होते. कि ढगांतून रेल्वे ये-जा करतीये कि काय? पण दृश्य मात्र सुंदरच वाटत होते. आम्ही सर्वच भेटलो खरे पण त्यात हि एकजण  उल्हासनगर वरून येणार होता. ७.३० वाजता आमच्या इंटरसिटी एक्स्प्रेसची यायची वेळ ठरलेली  आणि आमच्या उल्हासनगरीय प्रवाश्याचा पत्ताच नव्हता.(तसा तो पण मध्य रेल्वेचा प्रवासीच शेवटी) त्याने कल्याणहून पाचारण केल्या केल्या कळविले होते, पण ७.०० वाजे पर्यंत तरी त्याचा आम्हाला पत्ता नव्हता. सात चे सव्वा सात झाले पण पोहोचलेला नव्हता, "उगाच काढलेलं तिकीट फुकट जायचे!" (पक्का पुणेरी विचार माझ्या मनात चुकचुकला), शेवटी २-३ मिनिटांनी फोन आला कि कळव्याला गाडी पोहोचते आहे म्हणून पण इथे ७.३० ची गाडीची वेळ जवळ येऊ लागली होती. समोर कल्याण बाजू ने एक गाडी येताना दिसली तशी ती जरा घाईतच होती जणू पटापट आली काम उरकून निघून गेली, आम्ही मित्राला विचारले त्या गाडीत आहेस का म्हणून पण तो तिच्या मागच्या गाडीत होता इथे वेळ झटपट निघून चालली होती. थोड्याच वेळात समोरच्या धुक्याच्या दुलईतून हळूच पडदा बाजूला सारून एक गाडी पुढे सरकतीये अस दिसलं पण इथे आमच्या गाडीची अनाउन्समेंट चालू झाली. आणि लागलीच समोर भोंगा वाजला. लगेच आम्ही मित्राला फोन लावला आणि तो त्या समोरच्या ट्रेन मध्ये होता हे कळल.
                     इथे आमची गाडी स्टेशनात शिरायची आणि त्याची गाडी हळू हळू तिकडून स्टेशनात शिरण्याची एकाच वेळ झाली. आम्ही तटस्थ मतांनी होतो कि या शर्यतीत आमचा मित्र येतो पुढे कि आमची गाडी आणि आमची गाडी झटपट आली. मित्राची गाडी जणू रात्रभर काम करून थकली होती बिचारी अर्ध्या वाटेतच थांबली.(सिग्नल दिला हो तिला), आम्ही पटपट ट्रेन मध्ये चढलो. आणि उभ राहायला जागा शोधू लागलो. मित्र तर मागेच राहिला आम्ही त्याला फोन वरून बाय बाय करून पुढे निघालो तो मागच्या गाडीने येणार होता. माझा पुणेरी विचार खरा ठरला. फुकट तर फुकट जाऊ दे म्हणून मुंबैकरांसारखा शांत झालो, जनरल डब्ब्याचे  तिकीट काढून आम्ही आरक्षित डब्यात चढायचे साहस केले. पुढे इथे फक्त बसलेल्यांना तिकीट विचारले जाते उभ राहणाऱ्यांना  कुणीही, काहीही, कधीही बोलत नाही हे तेव्हा समजल! खाली जागा शोधण्यासाठी आम्ही एका मेकाच्या मागे ट्रेन मध्ये झुक झुक गाडी खेळत होतो पण शेवटी एका जागी शांत उभे राहून पुढचा प्रवास सुरु ठेवला. पुण्यात उतरतांना मात्र गम्मत का बार फुट गया आमच्या मधला एकजण (नाव घेणे करू शकत नाही) रेल्वेच्या डब्ब्यातल्या बाथरूमचा आवर्जून उपयोग करायला विसरला नाही तो बाथरूमात गेला खरा पण बाहेरून कुणीतरी कदीच घातली, आमची फलाटावर शोधाशोध पण चौथा काही सापडेना नंतर फोन खणखणला आणि आम्हाला समजले आमच्या बंदिवान मित्राची सद्यस्तीथी मग त्याच्या बाहेर आल्यावर आम्ही स्टेशनातून बाहेर पडलो. वेळेवर पुण्यात पोहोचून आम्ही पुण्याच प्राध्यापिक स्वागत सहन केले. आणि नंतर सर्व मित्रांसकट आमच्या बिछडलेल्या मित्रालाही भेटलो.
                    दिवसभराची भेट आवरून आम्ही सायंकाळी पुण्याहून मुंबईच्या परतीच्या प्रवासाला तयार झालो. पुणे स्टेशनला आल्यावर तिकिटे काढून आमच्या प्रवासाला सुरुवात  केली ते पण इंद्रायणीचे प्रवासी म्हणून, आत आल्यावर गाडी आमच्या स्वागताला उभीच होती. आम्ही खान पानाची तयारी जय्यत केली होती. गाडीत शिरल्यावर उभे राहण्यास सुद्धा जागा भेटत नव्हती आणि दिवसभर भटकल्याने पायांत त्राण  उरले नव्हते. पुन्हा एकामागे एक असे ट्रेन मध्ये आमची झुक झुक गाडी सुरु झाली आणि आम्ही ५-६ डबे पुढे गेलो त्यात मध्येच बसलेल्या आय बाया आमच्या नावाने शिव्या घालत होत्या. पाठीवर ब्यागा आणि धडा धडा पुढे चालताना कुणाच्या पायावर पाय तर कुणाला धक्का लागत होता. पण इंग्रजांच्या कृपेने आम्ही सोर्री सोर्री चा सूर करत पुढे पुढे सरकलो, पुढ पर्यंत जाऊन हि आम्हाला साधी उभ राहायला जागा मिळाली नाही. शेवटी पुन्हा आल्या पाऊली पुन्हा मागे फिरून पुन्हा ६ डबे ओलांडून, शेकडो लोकांना ओलांडून आणि शेकडो लोकांच्या करोडो शिव्या जश्या येताना खाल्ल्या तश्या जाताना खायची तयारी दाखवून आम्ही पाच साहसी मुलांनी पुन्हा आमची झुक झुक गाडी चालू केली..... आणि पोहोचलो शेवटच्या महिला वर्ग आरक्षित डब्यात..... डब्यात मोजून १० - १२ बायका पण पुरुषांनी बायकांच्या डब्ब्यात जायचं म्हणजे अनर्थच!!!!! तरीही आम्ही बिचारे गरीब दरवाज्याच्या बाजूला दबा धरून बसल्यासारखे बसलो आणि प्रवासाची मजा लुटून घेत होतो. थंडीने गार पडलेले आमचे नाक आणि गार वाऱ्याने शरीराची होणारी कुडकुड सहन करत आम्ही एक एक स्टेशन पार करत ठाण्याला उतरलो.
                   मित्रांनो एक प्रवास पण असंख्य गोष्टी ज्या पुरतात आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्या अनुभवायला आपण फक्त एक मजेदार प्रवास करायला पाहिजे असतो. आमचा प्रवास सुखकर झाला नसला तरी सुखद, शुभ झाला म्हणून आम्ही तृप्त होतोच आणि त्यासाठी मध्य रेल्वेचे आभार हि तेव्हडेच होते...... मग तुम्ही कधी करणार आहात प्रवास?  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा